💥छोटुभाऊ कांबळे यांनी जिल्हाधिकाऱ्यां मार्फत राष्ट्रपतीकडे केली मागणी💥
✍ मोहन चौकेकर
चिखली: साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करावे, अशा आशयाचे निवेदन भाई छोटू कांबळे यांनी आज दिनांक 4 जुलै रोजी राष्ट्रपती रामनाथजी कोविंद यांना जिल्हाधिकारीयांच्या मार्फत देण्यात आले आहे.
साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे अर्थात तुकाराम भाऊराव साठे एक समाजसुधारक, शाहीर, लोककवी, कादंबरीकार, नाटककार, अभिनेते तथा जगविख्यात असे लेखक होते. केवळ दीड दिवस ते शाळेत गेले. असमानता व भेदभावामुळे त्यांना शाळा सोडावी लागली. तरीसुद्धा त्यांनी मराठी भाषेत 35
कादंबर्या, जवळपास तीनशेपेक्षा जास्त कथा व त्यांचे 15 कथासंग्रह, 12
पटकथा, पोवाडा श्रेणीतील असंख्य गाणी व प्रवास वर्णन लिहिले. त्यांचे
साहित्य केवळ मराठी भाषेपुरते मर्यादित न राहता त्यांचे संपूर्ण भारतीय
भाषांमध्ये एवढेच नव्हे तर विदेशी भाषा म्हणजे सुद्धा ज्यात प्रामुख्याने
रशियन, जर्मन, इंग्रजी, जेक, पोलीश इत्यादी परकीय भाषात भाषांतरीत झाले
आहे. त्यांचे साहित्य फक्त जात, धर्म, भाषाच नव्हे तर देशाच्या
बंधनापर्यंतही पोहोचले आहे. ते फक्त साहित्यकारच नव्हते तर थोर असे समाज
सुधारक, शोषित वंचित, कष्टकर्यांचे नेते होते.
आपल्या सहित्यातून त्याचबरोबर चळवळ उभारुन त्यांनी शोषण, अन्याय व
अत्याचाराला विरोध केला. शब्दांना आपल्या कृतीच्या द्वारे ज्वालामुखीचे
स्वरुप देवून त्यांनी गोरगरीब, कष्टकरी व शोषित, वंचितांच्या निर्जीव
मनाला पेटविले. मराठी साहित्यात तसेच मानवतावादी चळवळीत अण्णाभाऊ साठे अढळ पदावर विराजमान झाले. अण्णाभाऊंच्या कार्याचा, विचारांचा व
साहित्याचा गौरव महाराष्ट्रातील जनतेनेच नव्हे तर विदेशातील देशांनीही
केलेला आहे. जिवंतपणी अण्णाभाऊंचा पुतळा रशियामध्ये उभारला गेला होता.
असे महानायक म्हणजे अण्णाभाऊ साठे होय. परंतु आपल्या देशामध्ये
महाराष्ट्र शासनाने फकीरा या कादंबरीला पारितोषिक देण्याशिवाय दुसरे
काहीच केले नाही. अण्णाभाऊंनी कित्येक कथा, कादंबर्या, गीत, नाटके
लिहिली. त्यापैकी काही साहित्य प्रकाशित झालेले असले तरी अजूनही त्यांचे
बरेच साहित्य अप्रकाशित राहून नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे
अण्णाभाऊ साठे यांच्या महान कार्याला आणि विचारांना अभिवादन करण्यासाठी भारत सरकारने भारतरत्न हा देशाचा सर्वोच्च पुरस्कार द्यावा, अशी मागणी शोषित पीडित समाजाच्या वतीने सातत्याने जोर धरत आहे.
अण्णाभाऊ साठेंचे कार्य हे राज्यापुरतेच मर्यादित नसून संपूर्ण देशाला
प्रेरणा देणारे आहे. तरी 1 ऑगस्ट 2019 रोजी त्यांच्यो 99 व्या जयंतीचे
औचित्य साधून त्यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करुन
अभिवादन करावे, अशी मागणी आज दिनांक 4 जुलै रोजी समाजाचे युवा नेते तथा संपादक भाई छोटू कांबळे यांनी राष्ट्रपती रामनाथजी कोविंद यांच्याकडे
जिल्हाधिकारी यांच्या मार्फत निवेदनाद्वारे केली आहे...
✍ मोहन चौकेकर
0 टिप्पण्या