💥16 मंत्र्यांच्या 90 हजार कोटींच्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची हिंमत दाखवण्याचे आव्हान💥
मुंबई (प्रतिनिधी) :- दि. 23 - आमच्या सरकारवर कोणताच डाग नाही, असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी जोरदार प्रहार केला आहे. इतकं धडधडीत खोटं बोलताना मुख्यमंत्र्यांची जीभ कशी कचरत नाही, असा थेट सवाल त्यांनी केला. तुमचं सरकार हे सर्वात कलंकित सरकार आहे, अशी तोफही त्यांनी डागली.
एका वृत्तवाहिनीवरील चर्चासत्रात सहभागी झालेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमच्या सरकारवर कोणताही डाग नसल्याचा दावा केला होता. त्यावर राष्ट्रवादीनं कडाडून टीका केली आहे. खोटं बोलताना मुख्यमंत्र्यांची जीभ कशी कचरत नाही, असा सवाल त्यांनी केला. तुमचं सरकार तर सर्वात कलंकित आहे. म्हणूनच प्रकाश मेहता यांना घरी जावं लागलं नाही का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
खोटी कागदपत्रे सादर करून शेतकऱ्यांचे अनुदान लाटल्याचा लोकायुक्तांनी ठपका ठेऊनही सुभाष देशमुख यांना तुम्ही मंत्रिपदावरून काढू शकला नाहीत. अजून बऱ्याच भ्रष्ट मंत्र्यांनी घरचा रस्ता पकडला असता, मात्र तुमच्या कृपादृष्टीने त्यांना तारलं आहे, अशी टीकाही त्यांनी केली.
मी स्वतः १६ मंत्र्यांचे ९० हजार कोटींचे घोटाळे बाहेर काढले. तुम्ही मात्र क्लीनचिट मास्टर निघालात. हिंमत असेल तर तटस्थ यंत्रणेमार्फत चौकशी होऊ द्या. मग तुमच्या सरकारवरील डागांचा हिशोब कळेल, असं आव्हानही मुंडे यांनी फडणवीसांना दिलं आहे....
0 टिप्पण्या