💥कार्यकारी अभियंता प्रसाद लांब यांचे परिश्रम यशस्वी💥
सेलू(दि.06 डिसेंबर) - लोअर दुधना धरणाच्या डाव्या व उजव्या कालव्यातून दि.02 डिसेंम्बर रोजी सिंचनासाठी पाणी सोडण्यात आले.पाणी सोडण्यापूर्वी जलसंपदा विभाग क्र 10 चे कार्यकारी अभियंता प्रसाद लांब यांनी पूर्ण कालव्याला भेटी देऊन जिथे जिथे गाळ अथवा झुडुपे वाढलेली होती ती सर्व यंत्रणा कामाला लावून तातडीने काढून घेतल्याने दोन्ही कालव्यामधून शेवटपर्यंत पाणी पोचत असल्याने शेतकरी वर्गातून आनंद व्यक्त होत आहे तर माजलगाव कळवा क्र 10 चे कार्यकारी अभियंता प्रसाद लांब यांनी वेळीच दक्षता घेऊन परिश्रम घेतल्याने त्यांचे परिश्रम यशस्वी झाल्याचे पाहायला मिळाले.
निम्न दुधना या प्रकल्पातून परभणी जिल्ह्यातील सेलू,जिंतूर,मानवत व परभणी या तालुक्यातील दुष्काळ सदृश 28698 हेक्टर क्षेत्रास पाण्याचा लाभ देण्यास परिपूर्ण आहे.या प्रकल्पास शासनाच्या प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत समावेश होऊन राज्य शासनाच्या संयुक्त अर्थसाहाय्याने प्रकल्प पूर्ण झाला असून यावर्षी झालेल्या भरपूर पावसाने लोअर दुधना प्रकल्प पूर्ण 100 टक्के भरला आहे.
यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे कालव्यात काही ठिकाणी गाळ साचला होता तर काही ठिकाणी झाडेझुडुपे वाढलेली होती.ही बाब लक्षात येताच कार्यकारी अभियंता प्रसाद लांब यांनी तातडीने संबंधित कंत्राटदारांना सांगून आणि स्वतः थांबून सर्व ठिकाणच्या अडचणी स्वतः दूर करून घेतल्या.02 डिसेंम्बर रोजी डाव्या व उजव्या कालव्यातून 21 क्यूसेसने पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे.यामुळे रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध झाले आहे.कालव्यातून काही अडचण निर्माण होऊ नये म्हणून लांब हे दिवसा व रात्री देखील कालव्याच्या क्षेत्रात स्वतः फिरून पाहणी करीत आहेत.कालव्यातून पाणी सोडल्यानंतर रात्री देखील स्वतः कालव्याच्या क्षेत्रात फिरून पाहणी करून कालव्याची पाहणी करीत आहेत.यामुळे शेतकऱ्यांना विनासायास पाणी उपलब्ध झाले आहे.तसेच कालव्याची स्वच्छता झाल्याने पाण्याचा प्रवाह चांगला राहून कालव्याच्या टेल पर्यंत पाणी पोचनारच असा विश्वास अभियंता लांब यांनी व्यक्त केला यामुळे शेतकऱ्यांमधून आनंद व्यक्त केला जात असून शेत शिवार हिरवीगार होणार आहेत.
💥शेतकऱ्यांना पाणी मिळाले यातच समाधान --प्रसाद लांब
यावर्षी लोअर दुधना धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे.सिंचनासाठी पाणी सोडल्याने ते पाणी दोन्ही कालव्याच्या शेवटपर्यंत पोचणार आहेच.गाळ,झुडुपे आम्ही अगोदरच काढून पाण्याचा प्रवाह अडणार नाही याची दक्षता घेतली आहे.परंतु पाणी हे जीवन आहे.शेतकऱ्यांसाठी पाणी सोडले आहे.परंतु सर्वांनी पाण्याचा जपून वापर करावा,पाण्याचा अपव्यय होऊ देऊ नये.शेतकऱ्यांना पाणी मिळाले यातच आम्हाला आनंद असून सर्वांनी पाण्याचा उपयोग घ्यावा मात्र पाण्याचा वापर जपून करावा असे आवाहन कार्यकारी अभियंता प्रसाद लांब यांनी केले आहे.
सेलू: पहिल्या छायाचित्रात कालव्यातून पूर्ण क्षमतेने उपलब्ध झालेले पाणी तर दुसऱ्या छायाचित्रात कार्यकारी अभियंता प्रसाद लांब हे स्वतः कालव्याची पाहणी करून सूचना देत आहेत.
0 टिप्पण्या