☀️स.रवींद्रसिंघ मोदी, नांदेड (पत्रकार) - ✍️
गुरबचनसिंघ स्व. खुशालसिंघ पोलिसवाले हा गृहस्थ शीख समाजात कायमचा स्मरणात राहील. दि.25 मे 2021 रोजी त्याने जगाचा निरोप घेतला. गेली अनेक वर्षें त्यांनी शीख समाजात पार पाडलेली एका विशिष्ट प्रकारची सेवा अगदी लक्षात राहण्याजोगी अशी आहे. स्व. गुरबचनसिंघ हा शीख समाजात मयतांच्या अंत्यसंस्काराची विधी पार पडणारा एक घटक म्हणून सर्वत्र प्रसिद्ध होता. समाजात कोणाच्या घरी जरी एखाद्या व्यक्तीचा मृत्यु झाला की सर्वात अगोदर गुरुभाई म्हणजेच ग़ुरबचनसिंग यांची आठवण व्हायची. अगदी फोन वर सूचना मिळवून गुरुभाई मयतीच्या तयारीसाठी धावपळ करायचा. अंत्यसंस्कारासाठी लागणारी सर्व सामग्री, साहित्य, पूजा व अरदास साठी लागणारी एक - एक वस्तुं तो स्वतः काही लोकांसोबत जाऊन खरेदी करायचा. शिवाय दुसऱ्या दिवशी अस्थिविसर्जनाची सेवा करण्यासाठी तत्पर असायचा.
समाजातील एक हजाराहून अधिक अंत्यसंस्कार विधीं, अस्थि विसर्जन विधी पार पडणारा गुरबचनसिंघ स्वतः त्याच शून्यात नाहीसा झाला. गुरुबचनसिंघ यांचे वडील स्व. खुशालसिंघ हे पोलीस सेवेत होते म्हणून गुरबचनसिंघ यांची इच्छा देखील पोलीस दलात काम करण्याची होती. पण इच्छा असून देखील वडिलांच्या कार्यक्षेत्रात त्यांना यश मिळवता आले नाही. दोन वेळेस पोलीस भर्तीत नशीब आजमावलं. एकदा शेवट पर्यंत सर्वगुण संपादित केले पण इतर उमेदवार त्यांच्याकडे असलेल्या शिफारशीं मुळे त्यांच्यापेक्षा वरचढ ठरले. दहावी पर्यंतचा अल्प शिक्षण देखील त्यांना वारंवार अडसर ठरला. एकदा ते माझ्याकडे एक अर्ज तयार करण्यासाठी आले होते. मी एका कामात गुंतलेला होतो. त्यांना अर्धा तास वाट पाहावी लागली. शांतचित्त आवस्थेत ते माझ्या कार्यालयात बसून राहिले. मी त्यांची माफी मागितली असता गुरुभाई म्हणाले, अरे आप क्यों माफी मांग रहें हो मुझे आपको फोन पर पूछकर आना चाहिए था ही त्यांची नम्रता होती. माझ्याशी ते नेहमी आदराने बोलायचे. समाजातील निधनाच्या बातमीसाठी ते माहिती द्यायचे.
गुरुभाई हे सुरुवातीला जीवनव्यापानासाठी सर्बलोहयाच्या धातूंचे कडे,चैन, लॉकेट तयार करायचे. त्यावर लहान छन्नीच्या सहाय्याने नाव कोरायचे. त्यांचे वडील भाऊ सुद्धा सुतारी कामात निपुण होते. शहीदपुरा भागात त्यांच्या घरासमोरच माझे आजोळ असल्याने बाल्यावस्थेत त्यांच्या कुटुंबियांना जवळून पहावयास मिळाले. नंतर गुरुद्वारा बोर्डाच्या श्री हजूरसाहेब आय.टी.आय. मध्ये त्यांना चतुर्थ श्रेणी नाईट वॉचमन म्हणून नियुक्ति मिळाली. गुरुद्वारा बोर्डातील तत्कालीन शिक्षण सभापति स. सरदूलसिंघ फौजी यांनी गुरुभाईला त्यावेळी बहुमूल्य असे सहकार्य केले होते. म्हणून गुरुभाईच्या जिवनव्यापनात स्थिरता आली म्हणावी लागेल.
धार्मिक कार्यात आवड असल्याने गुरु भाई यांनी जवळपास तीस वर्षांपूर्वी श्री दशमेश बाल शस्त्र विद्यालय हा गतका जत्था सुरु केला होता. गतका जत्था प्रमुख म्हणून त्यांनी अनेक वर्षें काम पाहिले. गुरुद्वारातून निघणाऱ्या प्रत्येक मिरवणुकीत गुरबचनसिंघ यांचा गतका सहभागी असतोच. त्यामुळे देखील गुरुभाई चांगलेच ओळखले जातात. सध्या गतका जत्था सांभाळण्याची जवाबदारी त्यांचा मुलगा उत्तम सिंघ यांच्याकडे आहे.
पण गुरु भाईची मुख्य सेवा म्हणजे मयतांवर अंत्यसंस्कार करण्याची होती आणि असली सेवा लोकांच्या कायमच लक्षात राहणारी आहे. दक्षिण भारतात म्हणजे महाराष्ट्र, तेलंगाना, कर्नाटक मध्ये कोणीही शीख धर्मीय व्यक्ती निधन पावला तर त्याच्या अस्थींचे विसर्जन नांदेड येथील गोदावरी नदीकाठी गुरुद्वारा नगिनाघाट शमशानभूमि जवळ करण्याची एक प्रथा होऊन गेलेली आहे. तीन ते चार राज्यातील शीख समाजासाठी गुरबचनसिंघ हा महत्वाचा दुआ म्हणून कामगिरी पार पाडत होते. एकदा त्यांना मी सहजच विचारलो होतो, गुरु भाई जी, तुम्ही एवढ्या मय्यतीं मध्ये रोज सहभागी होतात. कधी रात्रिच्या वेळीही शमशान मध्ये जावे लागते. तुम्हाला भूत - प्रेतं विषयी भीती वाटत नाही का ? यावर ते म्हणाले, खरं आहे. माझे भूतप्रेतात कमी विश्वास असले तरी आपण ज्यांच्या सेवेसाठी तेथे जातो, त्यांची पुण्याई माझे रक्षण करते असा माझा विश्वास होय. आणि मी गुरुबाणी उच्चारत असतो गुरुबाणी मध्ये माझे रक्षण करण्याचे सामर्थ्य असल्याने काही फिकर करायची गरज नसते. असले हे विलक्षण व्यक्तिमत्व, गुरुभाईच्या निधनामुळे अनेकांनी हळहळ व्यक्त केलेली आहे. गुरु भाईंच्या आत्म्यास चिरशांति लाभो हीच प्रार्थना आहे.
स. रवींद्रसिंघ मोदी, नांदेड (पत्रकार)
(9420654574)
......
0 टिप्पण्या