💥मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ट्विटर हँडलवर मुख्य सचिव सीताराम कुंटे यांची स्वाक्षरीनिशी आदेश जारी💥
मुंबई (दि.05 जुन 2021) : ताज्या घडामोडीत 4 जून 2021 च्या मध्यरात्री उशिरा म्हणजे 01.55 मिनिटांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ट्विटर हँडलवर मुख्य सचिव सीताराम कुंटे यांची स्वाक्षरी असलेले लॉकडाऊन उघडण्यासाठी अनलॉकची कार्यपद्धती अधिसूचना प्रसिद्धीस देण्यात आली आहे.
यामध्ये राज्य सरकारने कोरोना महामारीच्या संदर्भात लावण्यात आलेले कडक निर्बंध टप्प्या- टप्प्याने आणि लॉकडाऊन उघडण्यासाठी कार्यपद्धती आणण्यासाठी अधिसूचना जारी केली. राज्यातील पॉझिटिव्हिटी रेट आणि ऑक्सिजनयुक्त खाटांची उपलब्धता आधारे 5 स्तर तयार केले गेले आहेत. दर गुरुवारी त्याचा आढावा घेऊन या अनलॉकची अंमलबजावणी होईल. नागपूरसह विदर्भाच्या 11 पैकी 9 जिल्हे 7 जूनपासून पूर्ण अनलॉक होण्याच्या निकषावर बसत आहेत.
गेल्या 10-12 दिवसांपासून कोरोना स्थिती नियंत्रणात आली असून नव्या बाधितांचा आकडा 15 हजारांच्या घरात तर उपचाराधीन रुग्णांची संख्या सव्वा दोन लाखांपर्यंत खाली आली. राज्यातील जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी 1 जून 2021 रोजी काही निर्बंध शिथिल करण्यात आले होते.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या बैठकीत पुन्हा एकदा राज्यातील परिस्थितीचा आढावा घेऊन निर्बंध शिथिल करण्यावर चर्चा झाली. त्यात जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचे साप्ताहिक प्रमाण आणि ऑक्सिजनयुक्त खाटांची उपलब्धता या दोन निकषांच्या आधारे राज्यातील जिल्ह्यांची 5 टप्प्यांत विभागणी करण्यात आली आहे. त्यानुसार निर्बंध शिथिल करण्याचा प्रस्ताव आपत्ती व्यवस्थापन विभागाने ठेवला होता. चर्चेअंती या प्रस्तावास तत्त्वतः मान्यता देताना या निकषांच्या आधारे निर्बंध कठोर किंवा शिथिल करण्यासंदर्भात विस्तृत मार्गदर्शक सूचना 4 जून रोजी मध्यरात्री उशिरा मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी शासन निर्णयाद्वारे अधिसूचित केला आहे.
तसंच या निकषांचा आधार घेऊन टप्पेनिहाय निर्बंध शिथिल करण्याच्या बाबतीत सर्वच जिल्ह्यांच्या संबंधित प्रशासकीय घटकांकडून पूर्ण आढावा घेऊन त्याबाबतची नवीन नियमावली शनिवार सायंकाळपर्यंत बहुतांश जाहीर होईल.
पहिल्या टप्प्यात औरंगाबाद, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, गोंदिया, जळगाव, जालना, लातूर, नागपूर, नांदेड, नाशिक, परभणी, ठाणे, वर्धा, वाशिम, यवतमाळ अशा 18 जिल्ह्यांतील लॉकडाऊनचे सर्व निर्बंध हटवून अनलॉकची नवी नियमावली सबंधित जिल्हा प्रशासन प्रसिद्धीस देतील.
अंशत अनॅलॉक आणि काही जिल्ह्यांतील निर्बंध कसे शिथिल करणार याचेही सुधारित आदेश सबंधित जिल्हा प्रशासनाद्वारे निघणार आहेत.
राज्यात 5 टप्प्यांमध्ये अनलॉक होणार आहे. यासाठी राज्यातील सर्व जिल्हे आणि महानगर पालिका मिळून 43 भाग करण्यात आले आहेत.
5 टप्प्यांनुसार राज्यात अनलॉक करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी गुरूवारी 3 जून रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली होती. यासाठी संबंधित जिल्ह्यात असलेल्या पॉझिटिव्हिटी रेटची अट घालण्यात आली आहे. सध्याच्या परिस्थितीत 5 टप्प्यांमध्ये अनलॉक केलं जाणार आहे.
या 5 टप्प्यांपैकी पहिल्या टप्प्यानुसार ज्या जिल्ह्यांत 5 टक्के पॉझिटिव्हिटी रेट आहे आणि ऑक्सिजन बेड 25 टक्क्यांपेक्षा कमी अधिग्रहीत आहेत, अशा जिल्ह्यात संपूर्ण अनलॉक होईल. यामध्ये रेस्टॉरंट, शॉपिंग मॉल, नियमित दुकानं किंवा रेल्वे, वाहतूक सेवा देखील सुरू होतील. जिल्हे आणि महानगर पालिकांचे धरून एकूण 43 भाग पाडले आहेत. या सर्व नियमांची सोमवार 7 जून 2021 पासून अंमलबजावणी केली जाणार आहे.
पूर्ण अनलॉक लागू होणार्या जिल्ह्यांमध्ये सार्वजनिक ठिकाणे, उद्याने, सायकलिंक ट्रॅक, वॉकिंग ट्रॅक, खासगी कार्यालये, सरकारी कार्यालयांना 100 टक्के उपस्थितीची मुभा, क्रीडांगणे आणि शॉपिंग मॉल्स, थिएटर्सला परवानगी असेल. शूटिंगला देखील परवानगी असेल. सांस्कृतिक कार्यक्रमांना परवानगी असेल. लग्न सोहळ्यांना देखील 100 टक्के उपस्थितीची परवानगी असेल.
💥अशी असेल जिल्ह्यांची वर्गवारी :-
💥पहिला गट-
पहिल्या गटामध्ये ज्या जिल्ह्यांमध्ये 5 टक्के पॉझिटिव्हिटी रेट आणि 25 टक्क्यांहून कमी ऑक्सिजन खाटांची अधिग्रहित संख्या असेल, अशा जिल्ह्यांचा समावेश आहे.
अहमदनगर, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, धुळे, गोंदिया,
जळगाव, जालना, लातूर, नागपूर, नांदेड, ठाणे, वर्धा या जिल्ह्यांचा पहिल्या टप्प्यात समावेश आहे.
अत्यावश्यक सेवांसह सर्व दुकाने, आस्थापना नियमित वेळेप्रमाणे सुरू राहतील.
अत्यावश्यक नसलेल्या सेवांसह सर्व दुकाने, आस्थापनाही नियमित वेळेप्रमाणे सुरू राहतील.
सर्व शॉपिंग मॉल्स, नाट्यगृहे, मल्टिप्लेक्स आणि सिंगल सिनेमा थिएटर्स इत्यादी नियमितपणे सुरू राहतील.
💥दुसरा गट-
दुसर्या गटामध्ये ज्या जिल्ह्यांमध्ये 5 टक्के पॉझिटिव्हिटी रेट आणि 25 ते 40 टक्क्यांदरम्यान ऑक्सिजन खाटांची अधिग्रहित संख्या असेल, अशा जिल्ह्यांचा समावेश आहे.
औरंगाबाद, गडचिरोली, हिंगोली, मुंबई शहर, मुंबई उपनगर, नंदूरबार, नाशिक, उस्मानाबाद, पालघर, परभणी या जिल्ह्यांचा समावेश दुसर्या टप्प्यात आहे.
अत्यावश्यक सेवांसह सर्व दुकाने, आस्थापना नियमित वेळेप्रमाणे सुरू राहतील.
अत्यावश्यक नसलेल्या सेवांसह सर्व दुकाने, आस्थापनाही नियमित वेळेप्रमाणे सुरू राहतील.
सर्व शॉपिंग मॉल्स, नाट्यगृहे, मल्टिप्लेक्स आणि सिंगल सिनेमा थिएटर्स इत्यादी 50 टक्के क्षमतेच्या मर्यादेत नियमितपणे सुरू राहतील.
💥तिसरा गट-
तिसर्या गटात ज्या जिल्ह्यांमध्ये 5 ते 10 टक्के पॉझिटिव्हिटी रेट आणि 40 टक्क्यांहून जास्त ऑक्सिजन खाटांची अधिग्रहित संख्या असेल, अशा जिल्ह्यांचा समावेश आहे.
अकोला, अमरावती, बीड, पुणे, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांचा समावेश तिसर्या टप्प्यात करण्यात आला आहे.
अत्यावश्यक सेवांसह सर्व दुकाने, आस्थापना ह्या सर्व दिवस दुपारी 4 वाजेपर्यंतच सुरू राहतील.
अत्यावश्यक नसलेल्या सेवांसह सर्व दुकाने, आस्थापना ह्या शनिवार, रविवारी सोडून इतर दिवशी दुपारी 4 वाजेपर्यंत सुरू राहतील.
सर्व शॉपिंग मॉल्स, नाट्यगृहे, मल्टिप्लेक्स आणि सिंगल सिनेमा थिएटर्स इत्यादी पूर्णपणे बंद राहतील.
💥चौथा गट-
चौथ्या गटामध्ये ज्या जिल्ह्यांमध्ये 10 ते 20 टक्के पॉझिटिव्हिटी रेट आणि 60 टक्क्यांहून जास्त ऑक्सिजन खाटांची अधिग्रहित संख्या असेल, अशा जिल्ह्यांचा समावेश आहे.
रायगड, रत्नागिरी, सांगली, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचा समावेश चौथ्या टप्प्यात करण्यात आला आहे.
अत्यावश्यक सेवांसह सर्व दुकाने, आस्थापना ह्या सर्व दिवस दुपारी 4 वाजेपर्यंतच सुरू राहतील.
अत्यावश्यक नसलेल्या सेवांसह सर्व दुकाने, आस्थापना ह्या संपूर्णपणे बंद राहतील.
सर्व शॉपिंग मॉल्स, नाट्यगृहे, मल्टिप्लेक्स आणि सिंगल सिनेमा थिएटर्स इत्यादी पूर्णपणे बंद राहतील.
💥पाचवा गट-
पाचव्या गटात ज्या जिल्ह्यांमध्ये 20 टक्क्यांपेक्षा जास्त पॉझिटिव्हिटी रेट आणि 75 टक्क्यांहून जास्त ऑक्सिजन खाटांची अधिग्रहित संख्या असेल, अशा जिल्ह्यांचा समावेश आहे. पाचव्या गटात कायम रेड झोन असणार आहे.
वरील 4 टप्प्यांमध्ये नसलेल्या कोल्हापूर जिल्ह्याचा समावेश पाचव्या टप्प्यातील गटात करण्यात आला आहे.
अत्यावश्यक सेवांसह सर्व दुकाने, आस्थापना ह्या शनिवार, रविवारी सोडून इतर दिवशी 4 वाजेपर्यंतच सुरू राहतील.
अत्यावश्यक नसलेल्या सेवांसह सर्व दुकाने, आस्थापना ह्या संपूर्णपणे बंद राहतील.
सर्व शॉपिंग मॉल्स, नाट्यगृहे, मल्टिप्लेक्स आणि सिंगल सिनेमा थिएटर्स इत्यादी पूर्णपणे बंद राहतील.
💥कोणत्या टप्प्यात काय सुरु आणि काय बंद राहणार ?💥
दरम्यान, आत्तापर्यंतच्या आकडेवारीनुसार जिल्ह्यांची वर्गवारी 5 टप्प्यांमध्ये करण्यात आली असून यापुढे ज्याप्रमाणे जिल्ह्यांमधली कोरोनाची आकडेवारी बदलेल. त्यानुसार जिल्ह्यांची वर्गवारी देखील 1 ते 5 अशा टप्प्यांमध्ये बदलेल. यासाठी दर शुक्रवारी आकडेवारीचा साप्ताहिक आढावा घेऊन जिल्ह्यांच्या वर्गवारीमध्ये बदल केला जाणार आहे आणि त्यानंतरच्या दोन दिवसांनी म्हणजे सोमवारपासून नवीन नियमावली संबंधित जिल्हा प्रशासन निर्गमित करणार आहे.
0 टिप्पण्या