💥खा.इम्तियाज जलील यांनी अमरप्रीत चौकात उड्डाणपूल बांधण्याची केली मागणी💥
औरंगाबाद : औरंगाबाद शहराची गरज व जनतेच्या प्राथमिकतेला प्राधान्य देवुन अमरप्रित चौक येथे उड्डाणपुल बांधण्यात यावे याकरिता राष्ट्रीय महामार्गच्या अधिकाऱ्यांना योग्य ते निर्देश देण्याची रस्ते वाहतुक व महामार्ग केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे खासदार इम्तियाज जलील यांनी मागणी केली आहे. खा. जलील यांनी 2 वर्षापुर्वी सुध्दा तत्कालीन प्रकल्प संचालक पी.डी. गाडेकर यांना सविस्तर माहिती देवुन उड्डाणपुल बांधण्याची प्राथमिकता चिकलठाणा विमानतळासमोर नसुन अमरप्रीत चौक येथे असल्याचे निदर्शनास आणुन दिले होते आणि त्यानुसार योग्य त्या सुचना केल्या होत्या.
खा.इम्तियाज जलील यांनी गडकरी यांना दिलेल्या पत्रात नमुद केले की,औरंगाबाद शहरातून नगर नाका ते केंब्रिज शाळेपर्यंत जाणारा राष्ट्रीय महामार्ग आपल्या विभागामार्फत विकसित केल्याबद्दल मी आभारी आहे. सन 2015 मध्ये सदरील रस्त्यावर सव्र्हिस रस्ते, पदपथांसह बांधण्याची घोषणा करण्यात आली होती. त्यामध्ये विविध ठिकाणी उड्डाणपूल, सायकल ट्रॅकचा समावेश करुन सुमारे 400 कोटी निधी जाहीर करण्यात आलेला होता, परंतु सद्यस्थितीत फक्त 70 कोटी इतक्या कमी व मर्यादित निधीची मान्यता देण्यात आली असुन त्यामधुन सव्र्हिस रोड, सायकल ट्रॅक इत्यादी सुविधा वगळण्यात आलेले आहेत. औरंगाबाद शहर चिकलठाणा विमानतळासमोर फक्त एकच उड्डाणपूल, पादचारी क्रॉसिंग पुलांचे रुंदीकरण न करता सध्याच्या रस्त्याचेच नूतनीकरण प्रस्तावित करण्यात आले आहे.
औरंगाबाद शहराची सध्याची वस्तुस्थिती आणि वास्तविक आवश्यकता लक्षात घेता, चिकलठाणा विमानतळ ऐवजी अमरप्रीत चौकात उड्डाणपूल बांधण्यात यावे. औरंगाबाद शहरातील मुख्य बाजारपेठ अथवा इतरत्र ठिकाणी रहदारी व वाहतुक करण्यासाठी अमरप्रीत चौक या मुख्य रस्त्याचा वापर नागरीकांकडून होत असल्याने तेथे नेहमी वाहनांची वर्दळ जास्त असल्याने सतत वाहतुकीची कोंडी निर्माण होत असते. म्हणुन प्रत्यक्षात उड्डाणपूलाची आवश्यकता तेथे आहे. सद्यपरिस्थितीत प्रत्यक्षात काम सुरू झालेले नाही. प्रस्तावित पादचारी क्रॉसिंग निरुपयोगी आहे कारण व्यावहारिकदृष्ट्या तिची उपयुक्तता शून्यइतकीच असल्याने फक्त सरकारी पैशांचा अपव्यय असल्याचे खा. जलील यांनी दिलेल्या पत्रात नमुद केलेले आहे औरंगाबाद शहराची खरी गरज आणि प्राथमिकता लक्षात घेवुन आणि स्थानिक नगरपालिका प्रशासनाच्या सल्यानुसार अमरप्रीत चौक येथे उड्डाणपूल बांधण्याचे सुचना राष्ट्रीय महामार्गच्या संबंधित अधिकाऱ्यांना सुचना देण्याची मागणी खा. इम्तियाज जलील यांनी केंद्रिय मंत्री गडकरी यांच्याकडे पत्राव्दारे केली आहे.
औरंगाबाद शहरातील सर्वसामान्य जनतेची मागणी व प्राथमिकता लक्षात घेता उड्डाणपुल चिकलठाणा विमानतळाऐवजी अमरप्रीत चौकात बांधण्याच्या बाजूने जनतेचा कौल आहे. सुरवातीला उड्डाणपुल भारतीय राष्ट्रीय महामार्ग विभागाने अमरप्रीत चौकात प्रस्तावित केले होते . पण नंतर ते चिकलठाणा विमानतळासमोर का हलविण्यात आले ? याचे उत्तर संबंधित अधिकाऱ्यांनी दिले नसल्याचा प्रश्न खा. जलील यांनी दिलेल्या पत्रात उपस्थित केला आहे....
0 टिप्पण्या